दि अगस्ती कोड (भाग ३)

ते प्रेत अय्यरच्या अगदी जवळ पडले होते. तिघांचीही भीतीने एकदम बोबडी वळली होती. काय करावे ते कुणालाच सुधरत नव्हते. तशाच अवस्थेत काही काळ गेला. तिघेही जवळच्या झाडावर चढून बसले. थोड्या वेळाने कोणी जनावर आसपास नाही अशी खात्री झाल्यावर मग खाली उतरले. आता त्यांची भीड थोडी चेपली होती. कुतूहलाने ते प्रेत न्याहाळू लागले. त्याच्या सर्वांगावर ओरखडे आणि गळ्याजवळ दातांनी चावे घेतल्याचे दिसत होते. जखम तशी फार काही जुनी नव्हती. फार तर तासाभरापूर्वी तो माणूस मेला होता. त्याने कपडे काही फार घातले नव्हते. एक धोतरच काय ते त्याच्या अंगावर होते फक्त. आणि जानवे.

ते रक्तमाखले जानवे पाहताना अय्यरला कळेना- ह्या इतक्या निबिड जंगलात हा एकटा माणूस काय करत होता ? थोडेसे वर चढून गेल्यावर त्याला एक पिशवी दिसली- त्यातील वस्तू इतस्तत: विखुरलेल्या होत्या. एक तांब्याची ताटली, एक कमंडलू, थोडा तांदूळ आणि ३०-४० रुपये. नक्कीच हा कुण्या देवळाचा पुजारी असावा. त्याने ती पिशवी उचलली आणि बाकीच्या दोघांना दाखवली.

“हे काय?” दोघांनी एकदमच विचारले.

“देखो, ये आदमी पुजारी था यहीके किसी मंदिर का | पास मे जो आदिवासी बस्ती है वही के लोगोंको पूछना पडेगा |”

तिघे परत फिरले. साधारण २ तास चालून गेल्यावर तोडा आदिवासींची एक वस्ती होती, तिथे गेले.

“नाम इरंत मनितन पार्त्तोम.” (आम्ही एक मेलेला माणूस पाहिला)

“एंगे?” (कुठे)

“पोरिय मलै अरुगिल.” ( त्या मोठ्या डोंगराजवळ).

“अवनु मात्तुरू?” (तो पुजारी होता काय?)

“आमा”. (हो)

“चेमिक्कवूम! कडवूळ चेमिक्कवूम!! ( देवा वाचव )

अय्यरने पुढे जरा खोदून खोदून विचारले असता मुखीयाने माहिती सांगितली. त्या डोंगरावर एक कालीमातेचे मंदिर होते. गेल्या ६ महिन्यात याआधी ३ पुजार्यांचा असाच भीषण अंत झाला होता. बहुतेक तो कोणी नरभक्षक वाघ असावा. टोळीमधील काही लोक त्याला पाहिल्याचा दावा करीत होते. त्याला मारण्याचा प्रयत्न करून देखील काही होत नव्हते.वनखात्याला सांगितले असता ते लोक देखील आले होते, परंतु वाघ बराच हुशार निघाला. त्यांच्या सापळ्यांना त्याने काही दाद दिली नव्हती आणि राजरोस डरकाळ्या फोडत तो अख्खे रान घुमवत होता. आदिवासी हळूहळू हे मानू लागले होते की तो देवीचा वाघ आहे आणि आपल्या पापाचा बदला तो घेतो आहे. अजून तरी त्याची आदिवासींच्या मुख्य वस्तीवर हल्ला चढवण्याची हिम्मत झाली नव्हती, परंतु ते सावध होते.

दुपारी टोळीतील बाकीचे लोक त्या डोंगरापाशी जाऊन त्या पुजार्याचे शव घेऊन आले आणि त्याला अग्नी दिला. त्या रात्री तिघेही आदिवासींच्या वस्तीवरच थांबले. जेवणे झाली. भात आणि चिकन असा मेनू होता. चिकन पाहताच अय्यर ने तोंड फिरवले. मुखिया हसला आणि त्याला भात वाढण्याची सूचना केली. जेवणानंतर तांदळाची बियर पिता पिता मुखिया त्या तिघांना एकेक गोष्टी सांगू लागला. पांडेने वाघाबद्दल विचारले.

“पुली इरंत , नाम मकीऴच्चीयान. आन्द्रल एन्न चेय्य? पुली कचीवूगळ ” (वाघ मेला तर आम्ही सुखी होऊ, पण काय करावे? तो सुटून जातो. )

“तो फिर क्या करेंगे? ऐसेही बैठे रहेंगे?”

“निंगळ एन्ना चेय्यूटुम?” ( तुम्ही काय करू शकता?)

मुखियाच्या या सवालावर पांडे गप्प झाला. शेकोटीच्या ठिणग्यांकडे पाहत तिघेही बसून होते. बराच वेळ एकमेकांकडे पाहत शेवटी देशपांडे बोलला,

“नावू होगतेवी.” (आम्ही जातो).

“यल्लीगे होगता इदिरा नीवु?” (कुठे जाणार तुम्ही?)

“नाळे मंदिरल्ली होग बर्तेनी. स्वल्प नोडतीने. हुलीगागी बंदूक कोडी.” (उद्या मंदिरात जाऊन येतो, पाहतो काय आहे ते. वाघासाठी बंदूक द्या).

मुखियाला काही बोलायची संधी न देताच देशपांडे त्याच्यासाठीच्या झोपडीत निघून गेला. त्याच्याकडे क्षणभर पाहत मुखिया निघून गेला. अय्यर आणि पांडे दोघेही देशपांडेच्या झोपडीत गेले.

“निम्मा तली तिरगेदा” अय्यर म्हणाला.

“अबे पागल झाला तू देशपांडे! तुझं डोकं ठिकाणावर आहे का?”. पांडेने त्याचीच री ओढली.

“देखो भाई. नर्मदेच्या खोर्यात राहताना मला याची सवय झाली आहे. ही काय भानगड आहे ते मी पाहणार म्हणजे पाहणारच. “

“आदरे नी स्वत: यारु भाविसुत्तीया?” (तू स्वत: ला कोण समजतोस?)

” ना सामान्य मनशा. आदरे अवरिगे सहाय माडबेकू. नर्मदेच्या खोर्यात आणि आधी देखील मी स्वत: शिकार केली आहे. अजून काही लोक बरोबर घेतले तर काही अडचण येणार नाही. आणि तुम्ही येणार असाल तर या नाहीतर मी तसाच जाईन.”

“भडका मत देशपांडे! आमाला तू काय समजलास? आमी येनार मंजे येनारच. मी तर स्वत: माओवाद्यांबरोबर राहिलो आहे. मला नको सांगू तुझं कौतुक.”

“नीवु अल्ली होदरे ना वब्ना येनु माडली? मै अकेला क्या करुंगा?”

देशपांडे हसला. ते तिघेही हसू लागले. “3 fools aren’t we!” पांडे म्हणाला.

“लाख मोलाची गोष्ट बोललास”.

सूर्य उगवला. पांडे, देशपांडे आणि अय्यर या त्रिकूटाबरोबर मुखियाने ५ बंदूकधारी लोक दिले होते आणि त्यांना देखील ३ बंदुका दिल्या होत्या.अय्यरला याची सवय नव्हती. तो अजूनही घाबरलेलाच होता. पण शेवटी त्याने मनाचा हिय्या केला आणि त्यांची तुकडी निघाली. सुमारे २ तास चालल्यावर तो डोंगर आला.

“हुली! हुली!” एक आदिवासी ओरडला.

“एंगे?”

“इंगे”. त्याने एका पायाच्या ठशाकडे बोट दाखविले.

“हुली इप्पोमुतू इंगे “. (वाघ आत्ताच आहे इथे)

सावधपणे ते डोंगर चढू लागले. कुठे कसलीही चाहूल येत नव्हती. आदिवासी जरा घाबरले होते- हे त्रिकुट देखील जरा भेदरले होते. जंगलात नेहमीपेक्षा जरा जास्तच शांतता होती. कुठेतरी काहीतरी गडबड आहे हे सर्वांना जाणवत होते. पण पोटातले ओठावर आणायला मात्र सगळे कचरत होते. इतक्यात एका मोठ्या डरकाळीचा आवाज त्यांच्या कानावर पडला. सगळे जिथे जागा मिळेल तिथे लपून बसले. हे तिघे बाकीच्यांपासून जरा बाजूलाच पडले होते आणि त्यांना ते लक्षातच आलं नाही.
त्यांनी कानोसा घेतला. जरा स्थिरस्थावर वाटताच ते पुढे सरकू लागले. तोपर्यंत बाकीचे आदिवासी मागेच राहिले होते. बराच वेळ काही ऐकू न आल्याने ते जरा निर्धास्त झाले होते. हळू हळू मुंगीच्या पावलांनी जात जात ते शेवटी डोंगर माथ्यावरच्या त्या मंदिरासमोर पोहोचले.

अय्यरने तोपर्यंत इकडे तिकडे पाहून घेतले. बाकीचे कोणीच दिसत नव्हते. दगडी पायऱ्या आणि दगड खोदून बनवलेले मंदिर. पुढे एक पाणवठा. तिघेही पायऱ्या चढून जातात तोच कुणाची तरी चाहूल लागली-पण वाघ तरी नक्कीच वाटत नव्हता. दगडी भिंतीवर कुणा माणसाची सावली पडली होती. जीव मुठीत धरून तिघेही मंदिरात गेले. पाहतात तर काय आश्चर्य! तो भला थोरला वाघ रक्ताच्या थारोळ्यात कालीमातेच्या मूर्तीसमोर मारून पडला होता आणि त्याच्या पोटात एका आदिवासीने भाला खुपसलेला होता. त्यांना पाहताच त्याने तो भाला काढला आणि त्यांच्याकडे तो पाहू लागला.

तिघेही आ वासून त्याच्याकडे पाहू लागले. तो होताच तसा नजरेत भरण्यासारखा. मूळचा गव्हाळ वर्ण रापलेला, भव्य कमावलेले शरीर, मोठी दाढी, मोठा केशसंभार.
एक धोतरासारखे वस्त्र कमरेला लपेटलेले आणि एक उत्तरीय. वस्त्रे जुनी आणि जीर्ण दिसत होती. पोट पुढे आले होते. अशा या ढेरपोट्या म्हाताऱ्याने एक भलाथोरला वाघ कसा काय मारला, हे त्यांच्या अजूनही पचनी पडत नव्हते. त्याला आदिवासी म्हणावे तर तोडा लोकांपेक्षा त्याचे कपडे बरेच वेगळे होते. आणि त्याची वेशभूषादेखील खेड्यातील लोकांपेक्षा वेगळी होती- जुन्या पद्धतीची होती.

त्या रहस्यमय म्हातार्याकडे तिघे पाहत राहिले. शेवटी अय्यरने सुरुवात केली-

“वणक्कम!”

त्याने अय्यर कडे पाहिले. “वण…क्कम आगत्ता..”

आता पांडे आणि देशपांडेनी कान टवकारले. तमिळ बोलता बोलता एक संस्कृत वाटणारा शब्द कसा काय आला? ते ऐकू लागले.

“निन्गळ एंगे?” (तुम्ही कुठे असता?) अय्यरने विचारले.

“एत्तीरा..” (तिकडे). त्याने दक्षिणेला बोट दाखविले.

देशपांडे आता सरसावला. त्याला एक शंका आली होती.

“दोमो वेहो?” (घर कुठे आहे?) त्याने उत्तरेला बोट दाखवले.

“इल्ले येनु माडतिरा ?” (इकडे काय करताय?)

” युस्मा…येनु?” (तुम्ही काय करताय?) त्याने उलट प्रश्न विचारला.

आता तर तिघे अजूनच बुचकळ्यात पडले. त्याची भाषा म्हणजे तमिळ, कन्नड आणि संस्कृतचे एक विचित्र मिश्रण होते. संस्कृत चा वास आल्याबरोबर तिघांनी संस्कृत सुरु केले.

“भवत: किं नामधेयं?”

काही क्षण त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही आणि मग तो नुसताच हसला.

“भवान अत्र किं करोति?”

पांडे कडे रोखून पाहत काही वेळाने तो हळू हळू एकेक शब्द उच्चारू लागला.

“हुईली..क्रन्देती..महत..साम्मारती..” (वाघ आला होता त्याला मारले).

“भवान क:”?

“एग्झ्ह…घेन्ह…घेन्ह..” ( मी जाणतो ).

त्याच्या तोंडची अवेस्तन पेक्षा जुनी भाषा ऐकून तिघे रोमांचित झाले. आत्तापर्यंत पाहिलेल्या पैकी ह्याची भाषा सर्वात जुनी आणि विचित्र होती. याच्या टोळीची काही जर माहिती कळली, तर इंडो-युरोपियन भाषाशास्त्रात मोठी क्रांती घडणार होती. त्याच्या भाषेत प्रोटो-द्राविडी तसेच वैदिक संस्कृतपेक्षा देखील जुने शब्द होते. जीवाचे कान करून ते त्याचे बोलणे ऐकत होते .

“तू..क्वोये?” त्याने विचारले.

“वयं वैयाकरणिन: |” अय्यर उत्तरला.

त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मग थोड्या वेळाने तो म्हणाला

“तू..ह्मेण?” आणि मग स्वत:शीच म्हणाला..”यु”.

“किद?” मूर्ती कडे बोट दाखवून तो विचारता झाला.

एक भले मोठे प्रश्नचिन्ह तिघांच्या चेहऱ्यावर उमटले.

“जेनेज..” (देवी) पांडे उत्तरला.

” हुली इरांत, रुंबा नल्ला. धन्यवाद!” (वाघ मारल्या बद्दल धन्यवाद) अय्यर म्हणाला.

तो एकदा गडगडाटी हसला आणि त्या तिघांकडे एक दृष्टीक्षेप टाकून आला तसा निघून गेला. ते तिघे मात्र अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. वाघाचा विचार त्यांच्या मनातून आता पुरता गेला होता आणि त्याची जागा त्या विचित्र आदिवासीने घेतली होती. ते भान हरपून तिकडे उभे होते तेवढ्यात बाकीचे ५ जण तिथे आले.
त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. त्यांनी तिघांना विचारले की वाघाला कोण मारले? कारण वाघाची जखम ही एका भाल्याने केली होती आणि तिघांकडे बंदुका होत्या.

अय्यरने त्या रहस्यमय म्हातार्याचे वर्णन त्यांना सांगितले तर त्यापैकी कुणीही त्याला या भागात आधी कधीच पाहिले नव्हते आणि त्याच्या सारख्या इतर लोकांनापण कधी पाहिले नव्हते. पण महत्वाची गोष्ट ही होती की नरभक्षक वाघ आता मेला होता, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही . वाजत गाजत सर्वजण वस्तीपाशी आले आणि मुखियाने ती हकीकत ऐकल्यावर त्या तिघांचा मोठा सत्कार केला आणि त्यांचे मनापासून आभार मानले. रात्री मोठी मेजवानी ठेवली होती. पण तिघांपैकी कुणाचेच लक्ष तिथे लागत नव्हते. मुखियाच्या लक्षात ते आले.

” पाहुणे, तुम्हाला आमची मेजवानी आवडली नाही का? वाघाला मारल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत.”

“नाही अय्या. तिकडे दोड्डमलैवरती आम्हाला एक अतिशय विचित्र माणूस भेटला होता. त्याने तो वाघ मारला. आम्ही काहीच नाही केलं.”

त्याचे वर्णन ऐकल्यावर मुखियादेखील विचारात पडला.

“इतके पावसाळे पाहिले मी, पण अशी कोणतीही टोळी मी कधीही पाहिली नाही. या रानात तरी असे कोणीच लोक नाहीत.”

बराच वेळ विचारूनही मुखिया काही सांगेना- खरे तर त्यालाही तीच उत्सुकता लागली होती. तेव्हा त्यांनी तो नाद सोडला. तोडा टोळीचे आभार मानून तिघांनी त्यांचा निरोप घेतला.

परतीच्या प्रवासात तिघे बोलू लागले.

“तू सांग पांडे तो कसा होता ते. आदिवासी सारखा फार काही वाटत नव्हता.” देशपांडे म्हणाला.

“त्याच्या भाषेत प्रोटो-द्राविडी आणि प्रोटो-इंडो-युरोपीय शब्द देखील होते. द्राविडी शब्द वेद्दा भाषेसारखे आणि बाकीचे तर वैदिक पेक्षा जुने . मला तर असा वाटत होतं की जणू ब्राँझ युगातील भारतात मी गेलोय.” अय्यर म्हणाला.

“अबे त्याला तर मूरत म्हणजे काय तेपण माहिती नव्हतं.” पांडे म्हणाला.

प्रत्येकाकडे काही ना काही निरीक्षणे होती, पण त्याच्या भाषेचे स्थान कोणते आणि काल कोणता? हे प्रश्न सर्वात अवघड होते. ह्या भाषेत द्राविडी आणि इंडो-युरोपीय या भाषाकुलातील इतक्या जुन्या शब्दांची रेलचेल होती, की या भाषेचे स्थान कदाचित वैदिक संस्कृत पेक्षाही महत्वाचे ठरले असते.पण मग त्या मुखीयाला देखील माहिती नाही आणि आधीच्या भाषाशास्त्रज्ञांपैकीदेखील कोणीही अशी भाषा अस्तित्वात असल्याचे लिहिलेले नाही. पण पुरेशी माहिती हाती आल्याखेरीज काही उघड करायचे नाही असे तिघांनी ठरवले.

यथावकाश म्हैसूर आले. म्हैसूर ते पुणे रेल्वे प्रवासात देशपांडे एक पुस्तक वाचत बसला होता. प्राचीन तमिळ साहित्यातील अगस्त्य ऋषींना असलेले महत्व हा त्या पुस्तकाचा विषय होता. त्यात विन्ध्य पर्वत ओलांडून अगस्त्य कसे दक्षिणेस गेले, वेलीर लोकांना त्यांनी द्वारकेतून कसे दक्षिणेत वसवण्याच्या कामी सहाय्य केले, हे सर्व वाचत असताना त्याच्या डोक्यात एक विचार आला.

>> पुस्तकात दिलेली अगस्त्य ऋषिंची बरीच चित्रे आणि मूर्तींचे फोटो अगदी त्या म्हातार्याप्रमाणेच दिसतात, तंतोतंत चेहरा आणि अगदी वाढलेल्या पोटासकट!

चल काहीही!

>>पण त्याला तू कुठला विचारले असता त्याने उत्तरेकडे बोट दाखवले!

मग काय झालं?

>>तो मुखिया पण म्हणाला की आम्ही अशा कुणाला पाहिला नाही कधी म्हणून!

कदाचित..नसेल पाहिला..असेल कोणीतरी विचित्र माणूस..

>> त्याने आपलं नाव नाही सांगितलं! त्याला तो प्रश्न कळून देखील!

उम्म….होय.

>>त्याची भाषा तर वैदिक संस्कृत पेक्षा जुनी आहे!

….होय हे खरंय…फार जुनाट आणि विचित्र बोलत होता काहीतरी. मूळ संस्कृतसारखी असेलही, पण प्रोटो द्राविडी कितीतरी शब्द होते त्यात! आश्चर्यच आहे!

>> त्याला मूर्तीपूजा माहीत नव्हती!

…………..

विचार करून देशपांडेचे डोके बधीर झाले…तो रोमांचित झाला..काय आपण खरेच त्यांना भेटलो? अगस्त्य ऋषींना? द्वारकेतून ज्यांनी वेलीर क्षत्रियांना दक्षिणेत वसविले त्यांना? विन्ध्य पर्वताचं गर्वहरण करणाऱ्या अगस्त्यांना? वातापी राक्षसाला पचविणाऱ्या आणि अक्खा सागर पिऊन टाकणाऱ्या अगस्त्यांना?

त्याने हे अय्यर आणि पांडे दोघांनाही सांगितले. जें समजायचे ते तिघेही समजून गेले होते. तिघांनी मिळून प्रोटो इंडो युरोपीय आणि प्रोटो द्राविडी भाषांच्या सरमिसळीचा काळ त्या ऐकलेल्या भाषेच्या आधारे काढला आणि सध्याच्या रूढ काळापेक्षा तो कितीतरी जुना आहे, हे सिद्ध केले. त्यांच्या पेपरची जगभरात खूपच वाहवा झाली. काही शब्दांची व्युत्पत्ती त्यांनी जी मांडली होती, ती सर्वांनी मान्य केली- रूढ असलेल्या कोणत्याही पद्धतीने ते शब्द स्पष्ट करता येत नव्हते. तशा शब्दांना त्यांनी अगस्त्य शब्द असे नाव दिले-जें प्रोटो इंडो इराणियन आणि प्रोटो द्रविडीयन यांचे मिश्रण होते- पण अंदरकी बात अर्थातच कुणालाही कळली नाही- कधीच.

(समाप्त)

ता.क. :- हुश्श! अखेरीस संपली ही कथा. ४-५ महिन्यापूर्वी पहिला भाग लिहिला, तेव्हापासून रुतून बसलीये मनात. ती आज पूर्ण झाली. आता मोकळं वाटतंय..

Posted in कथा | 4 प्रतिक्रिया

दि अगस्ती कोड (भाग २)

श्याम देशपांडेचे बालपण सोलापुरात गेले.कानडी मुलुखाच्या तोंडाशी असल्याने मराठी इतकीच कन्नड देखील तिथे कानी पडत असे. त्याचे अनेक नातेवाईक व मित्र देखील कन्नड होते. त्यामुळे एक अपरिहार्यता म्हणून झालेला कन्नडचा परिचय पुढे भाषाशास्त्रात उपयोगी पडेल, असे त्याला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. पण पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये तौलनिक भाषा शास्त्राचा अभ्यास करताना मराठी आणि कन्नड मधील साम्यस्थळे त्याच्या इतकी पटकन लक्षात येत की बाकीच्यांना अचंबा वाटे. मग ते तूप-तुप्पा, अडकित्ता-अडकोत्तु असे शब्द असोत किंवा ळ चा मराठी मधील प्रादुर्भाव असो, त्याच्या नजरेतून एकही बाब सुटत नसे. हळूहळू त्याने मराठी , कन्नड, संस्कृत, हिंदी, इंग्रजी आणि कुतूहलापोटी बंगालीचा अभ्यासदेखील केला.

श्याम पुण्यात आपल्या केबिन मध्ये विचार करीत बसला होता. ही कॉनफरन्स त्याच्या दृष्टीने महत्वाची ठरली होती. रशियातील काही संशोधकांनी त्याच्याबरोबर काम करण्याची तयारी दाखविली होती. विशेषत: इरिना ग्लुश्कोव्हाने त्याच्या “मराठीची उत्पत्ती ही क्रिओलप्रमाणेच झाली आहे” या सिद्धांताला पाठींबा दिला होता. संस्कृत सारखे व्याकरण, शब्दसंपदा आणि द्राविडी शब्दसंपदा- विशेषत: कन्नड- असे मिश्रण साधारण ३००-४०० वर्षे शिजत ठेवले, की मराठी सारखी खमंग “डिश” तयार होते, असे त्याचे म्हणणे होते. त्या जुन्या काळात इतकी सरमिसळ होती, की नेमके कोण कुठले हेच कळत नव्हते. कन्नडचं एक ठीक आहे , पण श्रवणबेळगोळ सारख्या कानडी मुलुखाच्या अंतर्भागात चावुंडरायाचे नाव मराठीत अजरामर कसे काय झाले? तो शिलालेख त्याच्या डोळ्यासमोर उभा ठाकला. बाहुबलीच्या त्या अवाढव्य मूर्तीच्या डाव्या पायाजवळ तो मजकूर लिहिलेला होता. त्याची लिपी देवनागरी असली तरी हलकीशी बंगाली छटा त्यात जाणवत असे. दीर्घ वेलांटीचा फराटा काय किंवा “य” लिहिण्याची पद्धत काय, बंगालीसारखाच मामला होता सगळा…त्याला कोलकात्यातील दुकानांवरील पाट्या आठवल्या..बंगाली ब्राह्मण आधीपासून मासे-मांस खातात आणि कोकणातील सारस्वत देखील..त्यांच्यात एक परंपरा आहे की ते बंगालमधून आले आहेत म्हणून..मग त्यांच्या प्रभावाखाली ही लिपी अशी झाली असेल का? ते असो, पण मग मराठी आणि बंगाली मध्ये इतके साम्य कसे? भाताला “भात” फक्त मराठी आणि बंगालीमध्येच कसं काय म्हणतात?…त्याचा विचार करता करता डोळा लागला..

चेन्नईमधील इंडस रिसर्च सेंटर येथे इरावतम महादेवन आणि दंडपाणी अय्यर या दोघांची चर्चा चालली होती (अर्थात तमिळमध्ये)..महादेवन सांगत होते ,

“हडप्पामधील लिपी आणि प्राचीन तमिळ लिपी यांच्यात अतिशय साम्य आहे आणि हे इतर कोणत्याही भाषा अगर लिपीपेक्षा जास्त आहे.उदाहरणार्थ, हे चिन्ह पहा- X
इजिप्त आणि हडप्पा या दोन्ही संस्कृतींमध्ये सारख्याच अर्थाने हे चिन्ह वापरले जाते..शेतात पिकलेल्या पिकाचा पुरेसा हिस्सा अशा अर्थाने..”

“आप्पडिया !! आदिरेडी सिद्धांता! ” अय्यर उद्गारला. तमिळ भाषेच्या प्राचीनतेचा अजून एक पुरावा मिळाल्याने अय्यरला अजूनच भारी वाटत होते. अस्को पारपोला सारख्या ख्यातनाम द्रविड भाषाशास्त्रज्ञाने अय्यरने इलामो-द्राविडी सिद्धांताला केलेला विरोध वाखाणल्याने त्याचा हुरूप अजूनच वाढला होता. त्यावरचा पेरियारच्या द्राविडी विचारांचा प्रभाव तरुणपणाइतका नसला तरी अजून बराच शिल्लक होता. मदुराईमधून त्याने शिक्षण पूर्ण केले आणि मैसूर च्या CIIL (केंद्रीय भारतीय भाषा संस्थान) मध्ये कन्नड आणि मलयाळम या भाषांचा विशेष अभ्यास केला. तमिळखालोखाल त्याला कन्नड भाषा सफाईने येत असे. तोलकाप्पियं (प्राचीन तमिळ व्याकरण) त्याला अथपासून इतिपर्यंत मुखोद्गत होते. तमिळचा जाज्वल्य अभिमान असला तरी रोबर्ट काल्डवेलच्या The Dravidian Languages या पुस्तकाने त्याला भाषाशास्त्राची ओळख करून दिली, आणि ज्याप्रमाणे कडू काढा लोक तोंड वाकडे करून का होईना पितात, त्याप्रमाणे तो हिंदी देखील शिकला. मैसूरमध्ये त्याच्या कट्टर द्रविडवादी मित्रांनी त्याला त्याबद्दल टोमणे मारले, पण त्याचे एकच सांगणे होते.

“हिंदी भाषे उत्तर भारतदल्ली तुंबा महत्वपूर्ण अदे. अदक्क स्वल्परे माताडक्क बरबेकु. उत्तर भारतदल्ली हिंदीगे पर्याय इल्ला. मत्तू संस्कृत भाषेयल्ली बदलावणी आईते हेंग प्राकृत भाषागळू विकसित आदरु, अदे नोडक्क हिंदी कलबेकु”

(“उत्तर भारतात हिंदीला खूप महत्व आहे. त्यामुळे थोडेतरी बोलायला आले पाहिजे. तिकडे गेल्यावर हिंदीला पर्याय नाही. शिवाय संस्कृत पासून प्राकृत भाषा कशा तयार झाल्या, हे कळायला हिंदी शिकले पाहिजे”).

हा प्रांतीयवादाच्या पलीकडे जाणारा दृष्टीकोन राहुल पांडेकडे देखील होता. मूळचा हरियानातील रोहतक येथील राहुल पांडेला हरियानवी, पंजाबी आणि हिंदी भाषा तर येतच होत्या.शिवाय मैथिली, मगही आणि भोजपुरी या भाषांचा देखील त्याचा सखोल अभ्यास होता- अर्थात त्या भाषांचा परिचय होण्याचे कारण काहीसे वेगळे होते. दिल्लीला जे एन यु मध्ये एम ए च्या वर्गात असताना त्याचे एका मुलीवर प्रेम बसले- उत्तरप्रदेशमधील बलिया येथे एका सर्व्हे साठी गेला असताना एका गाव की गोरी ने त्याचे चित्त आकर्षून घेतले होते आणि तिच्याशी जास्तीत जास्त बोलता यावे म्हणून त्याने भोजपुरीचा दांडगा अभ्यास चालवला होता. प्रकरण सफल झालेदेखील असते, पण पांडेजींचा धीर होईना. शेवटी तिच्या नादात भोजपुरी शिकून पांडेजी दिल्लीला परत आले. तो संभाषणाचा अनुभव घेऊन आणि तद्दन बी-ग्रेड भोजपुरी सिनेमे बघत त्यांनी ती भाषा पाहता पाहता आत्मसात केली. एकदा भोजपुरी शिकली की मगही आणि मैथिली शिकणे म्हणजे हातचा मळ होता. त्याला नेहमी प्रश्न पडत असे, या भाषा म्हणजे हिंदीच्या नुसत्या बोलीभाषा आहेत की स्वतंत्र भाषा? तथाकथित अलाहाबादी हिंदीचे दुद्ढाचार्य पुरस्कर्ते या भाषांच्या संवर्धनाबद्दल जी उदासीन भूमिका घेत आणि रघुबीर सिंगांच्या अति जडजम्बाल, संस्कृताळलेल्या हिंदीची वारेमाप स्तुती करीत, ती त्याला बिलकुल नापसंत होती. परंतु असे असूनही नागरी प्रचारिणी सभेचा तो एक खंदा कार्यकर्ता होता. हिंदीचा पूर्ण भारतभर प्रसार करणे हे देशाच्या एकतेसाठी परम आवश्यक आहे, अशी त्याची धारणा होती. परंतु हिंदीभाषिक लोकांवर नेहमी जो दुसर्यांच्या भाषेला डावलण्याचा आरोप केला जातो त्याला तो अपवाद होता. रोहतक पासून पानिपत काही फार दूर नव्हते- शिवाय मराठ्यांच्या बद्दलच्या कथा-दंत कथा तो लहानपणापासूनच ऐकत होता. त्यामुळे मैसूर येथे CIIL मध्ये त्याने मराठी शिकून घेतली होती. आणि कन्नड बोलता आली नाही तरी बोललेले थोडेफार कळत असे.

पांडे कॉनफरन्सबद्दल विचार करीत होता. हिंदी भाषेतील शेतीशी निगडीत शब्दांपैकी अनेक शब्द हे आर्यन किंवा द्रविडीयन भाषांपासून आलेले नसून त्यांमागे आता लुप्त झालेली आणि या दोघांपासून वेगळी असलेली मूळ गंगेच्या खोर्यातीलच एक भाषा असली पाहिजे, असा दावा त्याने केला होता. त्याच्या या दाव्याला पुष्कळ जणांनी पाठींबा दिला होता. आता हिंदीची पूर्ण पाळेमुळे खणून काढण्यात आपण नक्की यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास त्याला वाटत होता….

कॉनफरन्सनंतर एक वर्ष उलटले. दरम्यानच्या काळात विशेष काही घडले नाही. सध्या तसेही आदिवासी भाषांचा अभ्यास करण्याचे एक फॅडच आले होते. जो तो आदिवासी भाषांच्याच मागे होता. मग आदिवासी भाषांसाठी लिपी तयार करणे असो अथवा त्यांचे व्याकरण लिहिणे असो- ग्लोबलायझेशनच्या रेट्यात या भाषा कधी आणि कशा नष्ट होतील हे सांगणे अशक्य होते आणि त्यामुळेच सर्व भाषा शास्त्रज्ञ “कल हो ना हो” या न्यायाने आपापल्या भागातील आदिवासी भाषांवर तुटून पडले होते. त्यामुळे देशपांडे नर्मदेच्या खोर्यातील निहाली भाषेचा अभ्यास करीत होता, तर पांडे आणि अय्यर हे अनुक्रमे कुरुख आणि कोडगू या भाषांचा अभ्यास करण्यात मग्न होते.

ते एक वर्ष तिघांसाठी बऱ्याच प्रकारे आमूलाग्र बदलाचे ठरले. आदिवासी समाजासोबत राहताना बऱ्याच बाबतीत आपल्या नेहमीच्या संकल्पनांना फाटा द्यावा लागतो हे तिघानाही कळून चुकले. बाकी समाजापासून पूर्ण अलग राहून निसर्गाच्या रौद्र रूपाशी कायम सामना करून चिवटपणे तग धरून राहणाऱ्या आदिवासिंबद्दलचा त्यांच्या मनातील आदर शतगुणित होत चालला होता.

सर्वांचीच खतरनाक परिस्थिती होती. नर्मदेच्या खोऱ्यात वाघांचे भय देखील होतेच. कुरुख प्रदेशात तर माओवादी होते. कोडवा भागात असे काही फारसे नसले तरी जंगलात राहण्याचे जे फायदेतोटे होते, ते अय्यरने देखील सहन केलेच होते. देशपांडेने तर एका मोठ्या रानडुकराच्या शिकारीत देखील भाग घेतला होता. आणि जिथे पांडे होता तिथे तर माओवाद्यांच्या चौकशीला तोंड देणे हे नित्याचेच होते. आदिवासी काय आणि माओवादी काय, सर्वांच्या मनात या बाहेरून येणाऱ्या शहरी लोकांबद्दल मोठा संशय असे. तो नष्ट करणे हे मोठे जिकीरीचे काम. पण तिघांनी हे शिवधनुष्य पेलले आणि त्या वर्षभर ते आदिवासींमध्ये मिळून मिसळून गेले.

तोपर्यंत CIIL म्हैसूर इथे अजून एक वर्कशॉप आयोजित केले गेले होते. अरुणाचल प्रदेशात एका नवीन भाषेचा शोध लागला होता. तिबेटो-बर्मन भाषासमूहामधीलच ती एक भाषा होती. त्या प्रदेशात नुकतेच फील्डवर्क करून आलेले दोघेजण मोठ्या उत्साहाने त्या भाषेची माहिती सांगत होते. नवीन भाषा सापडली म्हणजे तिचे व्याकरण, तिबेटो-बर्मन भाषाकुलामधील तिचे स्थान, तिचे उच्चारशास्त्र अशा सर्वच गोष्टी नव्याने करणे आले. आणि पहिलेपणाचा मान त्यांना मिळाल्यामुळे दोघेही उत्साहाने जणू फसफसत होते.

पांडे, देशपांडे आणि अय्यर या तिघांनीही तिथे हजेरी लावली होती. एक वर्षापूर्वीच्या कॉन्फरन्समधील वाद त्यांच्या डोक्यात अजूनही होताच. आदिवासी भाषांच्या अभ्यासातील काही गोष्टींची देवाणघेवाण त्यांच्यात आपापसात चालू होती, आणि त्यातून बऱ्याच गोष्टी उघडकीस येतील अशी त्यांची खात्री होती. निहाली आणि हिंदी मधील शेतीविषयक काही शब्दांमध्ये काही परस्परसंबंध असू शकेल, अशा निष्कर्षाप्रत पांडे आणि देशपांडे दोघेही आले होते. पण त्यासाठी अजून फील्डवर्क गरजेचे होते. इकडे अय्यर देखील मुंडा आणि द्रविडीयन भाषांच्या तौलनिक अभ्यासात काही निष्कर्ष काढू पाहत होता.

यथावकाश वर्कशॉप संपले. गेले वर्षभर सतत फील्डवर्क करून वैतागल्याने तिघांनीही जवळपास एक ट्रिप काढली होती. पांडे आणि देशपांडे दोघांचेही म्हणणे होते की जरा जीवाचे केरळ करू.

“नीवु नोडी, आगळे हेळबिडतिने, अदु हागे चन्नागि इरबेकू, यल्ला केरळ तोरस बिडी नामगे.” देशपांडे म्हणाला.

“आमा ! ” अय्यर उत्तरला.

“कोई अच्छी जगह ले जाओ यार, मस्त ऐश करेंगे | ” खुर्चीवर रेलून बसलेला पांडे म्हणाला.

“नाम पोवरम !”

“मतलब चलो!” पांडेच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहत देशपांडे म्हणाला.

आणि तिघेही केरळात गेले. प्रथम कोचीन, मुन्नार, कालडी, वायनाड, पोनमुडी इत्यादी स्थळे पाहत त्रिवेंद्रम आणि पद्मनाभपुरमला गेले. अय्यर ने मलयाळम यथेच्छ पाजळून घेतली आणि पांडेची डोकेदुखी अजूनच वाढली. ते सगळे, ळ सारखे मूर्धन्य स्वर ऐकता ऐकता मूर्च्छा येऊ शकते हा पांडेचा एक लाडका सिद्धांत होता. आणि द्राविडी भाषांवर कोणी चेष्टेने केलेली टीका देखील अय्यरला सहन होत नसे. पण बदला घेण्याचा एक मौका अय्यरला लवकरच आला.

त्याचे असे झाले, अय्यर चे पूर्ण नाव होते एम.सी. डी.अय्यर. पांडेने एकदा त्याचे नाव विचारले आणि अय्यरने जी मालगाडी सुरु केली काय विचारता…

“अय्यर…दंडपाणी अय्यर..मुत्तुस्वामी दंडपाणी अय्यर..चिन्नास्वामी मुत्तुस्वामी दंडपाणी अय्यर..पेरुम्बुदूर चिन्नास्वामी…”

“नही नही अय्यर बस कर अब…मै तेरे हाथ जोडता हुं, पांव पडता हुं लेकीन तुम मुझे बक्ष दो |” पांडे कळवळून उत्तरला आणि बाकीचे दोघेही हसण्यात बुडाले..

केरळची सहल मस्त चालली होती. परत जायला अजून काही दिवस बाकी होते.अय्यरचे म्हणणे पडले की निलगिरी पर्वतामध्ये ट्रेक करूया. तामिळनाडू , केरळ आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमारेषेवर ही पर्वतरांग होती आणि राहायलादेखील चांगल्या सोयी होत्या. आणि तोडा नामक आदिवासिदेखील तिथे राहत असत.

निलगिरीची उंच तरीही आवाक्यातील शिखरे, घनदाट वनश्री आणि विविध प्राणी-पक्ष्यांच्या आवाजांनी तिघांच्याही डोक्यातील ती कीसकाढू प्रवृत्ती काही काळ का होईना शमली होती….एकही शब्द ना बोलता संथपणे मार्गक्रमण चालले होते. वाटेतील जळवा, साप आणि क्वचित कुठे लागणारी जनावराची चाहूल यापलीकडे फारसे काही घडतविघडत नव्हते. पांडे निवांतपणे शीळ घालत चालत होता, इतक्यात त्याला कसली तरी चाहूल लागली. त्याने बाकीच्या दोघांना खुणेनेच सांगितले. ते पाहू गेले तर वरच्या घनदाट झाडीतून कुणाच्या ध्यानीमनी नसताना एका पुरुषाचे प्रेत त्यांच्यासमोर पडले. ..(क्रमश:)

Posted in कथा | यावर आपले मत नोंदवा

दि अगस्ती कोड (भाग १)

स्थळ : अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील भाषाशास्त्र विभाग.

वक्ता: मायकेल विट्झेल.

“सर्वप्रथम या कॉनफरन्सला आल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. प्रोटो-इंडो-युरोपियन भाषांचा इतिहास हा जागतिक इतिहासातील एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे हे तर आपण जाणताच. आज दहाव्या जागतिक भाषाशास्त्र कॉनफरन्सच्या निमित्ताने एक अतिशय महत्वाचा शोध मी आपल्यापुढे मांडू इच्छितो, ज्याने पूर्ण मानवी संस्कृतीच्या इतिहासातील एका अतिशय महत्वाच्या कोड्याचे उत्तर अखेर मिळेल आणि बऱ्याच गोष्टींची समीकरणे बदलतील.. बर्नोफ, माक्स मुल्लर, विलियम जोन्स आणि जेम्स प्रिन्सेप यांच्या काळापासून आज जगात इतकी कल्पनातीत प्रगती झाली की शेवटी ह्या महागूढाची आपण उकल करू शकलो.”

श्रोत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली. नक्की विट्झेल ला काय म्हणायचे होते? त्याचा विषय म्हणजे प्रोटो-इंडो-युरोपीय भाषा हा होता. या विषयाचा संशोधक होणे म्हणजे काटेरी मुकुट घातलेला राजा होणे होते. इतकी अनिश्चितता, स्थळ-काळाचा इतका विस्तृत पल्ला आणि त्यावर अवलंबून असलेली अगणित सांस्कृतिक समीकरणे म्हणजे शुद्ध वैताग होता. पण या विषयात नवा शोध लावणे म्हणजे जणू मानवी संस्कृतींच्या इतिहासावरला काळाचा पडदा काढून टाकणे होते- प्रोटो इंडो युरोपियन भाषेचे आणि पर्यायाने आर्य लोकांचे मूळ स्थान शोधणे हे प्राचीन इतिहास, पुरातत्वशास्त्र आणि भाषाशास्त्र यांसामोरचे सर्वात मोठे आव्हान होते. त्यामुळे यात थोडीशी जरी प्रगती झाली तरी जगाच्या एका अति प्राचीन परंपरेचा उलगडा होईल हे स्पष्ट होते- ज्या भाषेच्या शाखा होऊन त्यांचे रूपांतर पुढे संस्कृत, ग्रीक आणि लातिनमध्ये झाले, आणि जगातील साधारण ६ अब्ज लोकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त लोक ज्या भाषेपासून उत्पन्न झालेली कोणती तरी एक भाषा बोलतात, त्या भाषेचे मूळ स्थान म्हणजे मानवी संस्कृतीचे मूळ स्थान सांगण्यासारखेच होते.

पारशी लोकांच्या अवेस्तामधील वर्णिलेले मूळ स्थान “आर्यांना वेजो”, हिंदू पुराणांमधील आर्यांचे मूळ स्थान म्हणून उल्लेखिलेला सोन्याचा मेरू पर्वत यांचे खरे स्थान कळेल म्हणून लोक कान टवकारून बसले होते. उतार ध्रुवापासून ते उत्तर प्रदेशापर्यंत हरेक प्रदेश हाच आर्यांचे मूळ स्थान असे लोक ठासून सांगत- ते आता संपणार होते. या रहस्यभेदाची बरोबरी करू शकेल असे एकच रहस्य होते ते म्हणजे बुडालेल्या अटलान्तीस बेटाचा शोध होय. पण हा शोध त्यापेक्षाही जबरी होता.

विट्झेल सांगत होता,

“माझ्या नवीन संशोधनानुसार आर्य लोकांचे मूळस्थान हे आजच्या अफगानिस्तान मध्ये असून ते भारतात – म्हणजेच सिंधू नदीच्या खोर्यात द्रविड लोकांच्या संपर्कात साधारण इ स पू २००० मध्ये आले असावेत. इतर संशोधकांच्या तुलनेत या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावे आहेत ते मी सांगेनच….. “

श्रोत्यांमध्ये खळबळ उडाली. म्हणजे आर्यांचे मूळ स्थान हा तसा अतिशय चावून चावून चोथा झालेला विषय असला तरी या ना त्या करणाने कायम चर्चेत राहणारा विषय होता. श्रोत्यांमध्ये जगभरचे भाषा शास्त्रज्ञ बसलेले होते. काही संस्कृतवाले, काही तमिळवाले, काही आदिवासी भाषांचे अभ्यासक तर काही निव्वळ तुलनात्मकरीत्या भाषांचा अभ्यास करणारे. हा आर्यांचा प्रश्न म्हणजे एक एकदम कठीण कोडे होते- भाषाशास्त्रातील गोर्डियन नॉटच जणू. गेल्या २०० वर्षांत हा प्रश्न उपस्थित झाल्याबरोबर शेकडो लोकांनी- त्यात हौसे, गवसे आणि नवसे तसेच खरोखरचे अभ्यासू हे सर्व होते- त्यात लक्ष घातले. काहींची मते एकदम हास्यास्पद होती- पाहताक्षणी त्यातला फोलपणा जाणवत असे. तर काहींची मते व्यवस्थित अभ्यासाअंती बनविलेली असत- पण तरीही ह्या कोड्याची उकल करण्यात कुणालाही यश आले नव्हतेच. नाही म्हणायला एक “आर्यन बेल्ट” तयार करण्यात संशोधकांना यश आले होते- एक असा प्रदेश जिथे आर्यांचे मूळ स्थान असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. तो एक अतिशय मोठा भूप्रदेश होता- उत्तरेस कझाखस्तान पासून ते दक्षिणेस इराणपर्यंत, पश्चिमेस तुर्की ते पूर्वेस पंजाबपर्यंत. याहीपुढे जाऊन कोणी त्या प्रदेशात मंगोलिया देखील समाविष्ट करीत- पण एवढ्या मोठ्या गवताच्या ढिगात ही आर्यांची सुई नेमकी होती तरी कुठे? ते न कळले तरी विविध विचारसरण्या शिरोधार्य मानून त्यांच्या आधारे लोकांची मने भडकावणे हाच धंदा असलेले कितीक लोक कान टवकारून विट्झेलचे भाषण ऐकत होते.

विट्झेल सांगत होता,

” ऋग्वेदामध्ये घोड्याचा उल्लेख वारंवार येतो. त्याउलट एवढ्या मोठ्या सिंधू संस्कृतीमध्ये कुठेही घोडा आढळत नाही. इ स पू १७०० च्या आधी भारतात घोड्याचे अवशेष मिळाले नाहीत-त्यामुळे घोडा हा प्राणी भारतात आर्य लोकांनी बाहेरून आणला असे म्हणावे लागते..प्रोटो-इंडो-युरोपियन भाषेची शब्दसंपदा मुख्यत्वेकरून पशु पालन करणाऱ्या आणि भटके जीवन जगणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीशी निगडित आहे, त्यामुळे पंजाबच्या सुपीक जमिनीत आर्यांचे मूळ स्थान असणे अशक्य आहे…..याउलट जर प्रोटो-द्राविडी भाषेशी शब्दसंपदा पहिलीत तर शेतीशी निगडित असे बरेच शब्द सापडतील. त्यामुळे द्राविडी संस्कृती ही मूळ भारतातीलच आहे असे म्हणावे लागते…”

द्रविडवादी लोक “जितं मया”अशा अविर्भावात होते.तोच पुढचा मुद्दा चर्चेला घेतला गेला.

“आणि जर ऋग्वेदाचा बारकाईने अभ्यास केला, तर त्यामध्ये असे दिसून येईल, की बाहेरून आल्याचा आर्यांच्या बाबतीत कुठेही उल्लेख नाही- शिवाय त्यात उत्तर भारताचा-विशेष करून पंजाब- तपशीलवार उल्लेख
आढळतो.दास आणि दस्यू यांना जरी काळे म्हटले असले, तरी कण्व ऋषी देखील काळेच होते असे नमूद आहे…म्हणजे निव्वळ काळेगोरेपणाच्या आधारे आर्य आणि अनार्य असा भेदभाव करणे चुकीचे आहे..”

आता तर आर्य हे मूळ भारतातलेच, अशी भूमिका असलेले लोक देखील चक्रावले. या बाबाला नक्की काय म्हणायचे आहे हेच त्यांना नक्की कळेना. कारण कोणत्याच एका पक्षाला निरपवाद पाठींबा मिळेल, असे त्या संशोधनातून निष्पन्न होत नव्हते..त्यामुळे शेवटी उथळ लोकांनी तिथून लक्ष काढून घेतले आणि “निके सत्व” निवडणे सुरु झाले.

अनेक मुद्दे चर्चेला घेतले गेले- ब्राहुई भाषेचा उगम आणि संस्कृत भाषेतील ट, ठ, ड, ढ, ण या व्यंजनांचा इतिहास, हे मुद्दे विशेष करून गाजले. ब्राहुई भाषेचा विषय निघताच तमिळनाडू मधील संशोधक दंडपाणी अय्यर यांनी विट्झेल च्या मुद्द्याला पाठींबा दिला. त्यांचेही म्हणणे असेच होते की ब्राहुई भाषा ही मूळ द्रविड भाषेपासून ३०००-४००० वर्षांपूर्वी वेगळी झाली आणि नंतर आर्य लोकांच्या प्रभावामुळे त्या भाषेची पीछेहाट झाली, आणि नंतर द्रविडभाषिक लोक दक्षिणेत स्थिरावले.

पण या मुद्द्यावर महाराष्ट्रातील श्याम देशपांड्यांनी जोरदार हरकत घेतली. त्यांचे म्हणणे असे की एका ब्राहुईवरून बाकीच्या भाषांच्या इतिहासाची सरणी लावणे म्हणजे मूर्खपणा आहे. त्यासाठी मुळात ब्राहुई भाषा किती जुनी आहे, आणि तमिळपेक्षा प्रोटो द्राविडी भाषेशी तिचे साम्य किती आहे, हे तपासले पाहिजे. अय्यर आणि देशपांडे यांचा वाद सुरु झाला आणि बाकीचे पाहत बसले- अगदी विट्झेल देखील-कारण द्राविडी भाषांचा त्याचा इतका अभ्यास नव्हता. शेवटी अस्को पर्पोला आणि इरावतम महादेवन या प्रख्यात द्रविड भाषाशास्त्रज्ञांनी मध्यस्थी केली आणि मगच तो वाद शमला.

संस्कृत भाषेतील ट, ठ, ड, ढ, ण या व्यंजनांचा इतिहास पाहताना तर अजूनच खतरनाक वाद झाले. दिल्लीच्या राहुल पांडे यांचे म्हणणे असे पडले की निव्वळ ती व्यंजने असल्याने संस्कृत मध्ये द्राविडी भाषांकडून आली असे म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती आहे, कारण नुरीस्तानी भाषेत देखील ती व्यंजने आहेत. पण अय्यर पुन्हा एकदा पेटले आणि त्यांनी सप्रमाण दाखवून दिले की ती व्यंजने फक्त द्राविडी भाषा आणि संस्कृत पासून विकसित झालेल्या भाषांमध्येच पाहायला मिळतात आणि इंडो-युरोपियन भाषांचा इतिहास पाहता ती व्यंजने म्हणजे द्राविडी भाषांकडून केलेली आयात आहे. दोघेही आपापल्या मुद्द्यापासून जाम हटेनात- बी बी सी च्या पत्रकारांची चांगलीच धांदल उडाली त्या वादाला “कव्हरेज” देताना.

शेवटी कॉनफरन्स संपली, पण उत्तरापेक्षा प्रश्न जास्ती निर्माण करूनच. जगभरातील दैनिके, मासिके आणि संशोधन जर्नल्स यांमध्ये या विषयावरील लेखांचा खच पडला- कधी नव्हे ते चेन्नई टाईम्सच्या पेज ३ वर “Retro look for a Retroflex-rich language” या शीर्षकाखाली तमिळ सिने तारकांनी १९५०-६० च्या वेशात पोजेस दिल्या. द्रविडवादी पत्रांत पुन्हा एकदा हिंदी विरोधी लेख सुरु झाले. तथाकथित बहुजनवाद्यांचा प्रचार शिगेला पोहोचला- परकीय आर्य लोकांनी आता भारत सोडण्याची वेळ आली आहे, बहुजनांनी आता जागे व्हावे, परकीय अफगाणी गुलामगिरी झुगारून द्यावी अशा अर्थाचे मथळे, पोस्टर्स सगळीकडे झळकू लागली.

लोक एक्साईट झाले होते- पण सामान्य लोकच नाही, तर संशोधक देखील. भारतातील आपापल्या क्षेत्रातील प्रथितयश संशोधक म्हणून पांडे, देशपांडे आणि अय्यर यांची गणना होत असे.विट्झेलच्या संशोधनातील त्रुटी जरी नजरेसमोर असल्या, तरी त्याचा निष्कर्ष सहजी नाकारून देण्या सारखा नव्हता खासच. तिघांना कुठे तरी जाणीव होत होती, की कुठे तरी काही तरी अजून बाकी आहे आणि आपण ते करू शकतो.पण पुढील १-२ वर्षांत काही घटना अशा घडल्या की त्यांचे तिघांवर दूरगामी परिणाम होणार होते…(क्रमश:)

Posted in कथा | यावर आपले मत नोंदवा

भारतीय टीम चा हादगा

एक बॉल टाकू अरे दोन बॉल टाकू
दोन बॉल टाकू अरे तीन बॉल टाकू
तीन बॉल टाकू अरे चार बॉल टाकू
चार बॉल टाकू अरे पाच बॉल टाकू
पाच बॉल टाकू अरे सहा बॉल टाकू

सहा बॉल च्या ओव्हरी
बॉल टाकी बॉलर

रण रण उनी रन रन देई
ऑफ साईड चौका मारे
ऑन साईड छक्का मारे

अश्शी ब्याटिंग सुरेख बाई माराया मिळतं
अश्शी बोलिंग द्वाड बाई जग अपुली मारीतं

कित्ती बोलिंग सुरेख बाई जरी ती टाकली
मध्ये पचके वेडा जैशी हो टवळी

सगळे साजरे झाले आता की जिंकलो
असे म्हणता म्हणता आम्ही गाफील झालो

तिकडून आला नेहरा त्याने निरखून पाहिले
लिंबूटिंबू त्याला ब्याट्समन वाटला

टप्पा टप्पा त्याने बॉल तो टाकला
चौका छक्का त्याने खोलून मारला

कागदावरची किती भारी ही टीम
भरून द्यावी त्यांना कागदाची रीम

घाण करा सगळे कागद यथेछ
मैदान तरी किमान राहील स्वछ

Posted in कविता-बिविता | 4 प्रतिक्रिया

कप्तान jack sparrow

कृष्णमौक्तिकाचे कप्तान आणि महान फिरंगी दर्यासारंग कप्तान jack sparrow ( जीमेल मध्ये jack चे transliteration
जाचक असे होते हे बहुत सूचक आहे) यांचे आम्ही परम म्हणजे अगदी चरम गरम पंखे. उष्ण असो व शैत्य, अस्मादिकांची वाणी
त्यांना वर्णिताना कधीच शिणत नाही. २००४ साली यांनी अस्मादिकांना प्रथम दर्शन दिले आणि आम्ही वात झाल्यागत यांचे पंखे होऊन फिरू लागलो.
असे आहे तरी काय हो यांच्यात? ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या एका दर्शनाने मुहूर्तमात्री मिळेल येविषी किमपि आन्येथा नाही .
काय तो रांगडा आवेश आणि काय ते संवाद! अशी चौफेर फटकेबाजी चाललेली नुसती. कमीतकमी किलोभर वजनाचा तो शिरस्त्राणातून खाली घोळणारा नानामणीविभूषित विपुल केशसंभार, भेदक ( की “रम”लेले) डोळे , आणि तितकेच चपळ शरीर ही त्याची शस्त्रे . परंतु त्याचे ब्रह्मास्त्र म्हणजे त्याची बुद्धी. बार्बोसा आणि डेवी जोन्स यांसारख्या खुंखार चाच्यांना मामा बनवणारी आणि कटलर बेकेटसारख्या स्वार्थी अधिकार्यास अस्मान( की समुद्रतळ) दाखविणारी, कृष्णमौक्तिकावरील लोकांनी बंडाळी करून निर्जन बेटावर सोडून दिल्यावरही ना डगमगता “रम्य”पणे लोकांशी डील करून निसटून जाणारी.
अस्मादिकांनी जेव्हा ही त्रिभागिनी चाचामालिका प्रथम पहिली, तेव्हातर मनी इतुका आनंदू ओसंडला की त्यांचे तेच जाणोत. एका आगळ्याच विश्वाचा साक्षात्कार जाहला. हे सागरी विश्व जितके गूढ, तितकेच रोमांचक आणि तर्हेतर्हेच्या खतर्यांनी भरलेले. मज भूचरास त्यांनी पाहता पाहता समुद्री नेले. प्रथम राष्ट्रभाषा हिंदीतील दिव्य संवाद कानावर पडले – जे एरवी dubbing या शब्दाचा मराठी उच्चार सार्थ करतात.पण या मालिकेतील पहिल्या चित्रपटाचा (कृष्णमौक्तिकाचा शाप) संवाद असे अप्रतिम आहेत की काय सांगू. हजारो channels वर लक्ष वेळा आणि आता तर अंकमूर्धा संगणकावर
डाउनलोड करून पाहिले तरी तृप्ती कशी ती झाली नाही. मासला पाहाल तर तो असा आहे:

इथून पुढे cjs = कप्तान jack sparrow ; हे फिक्स.

तर हे साहेब जेव्हा विलच्या लोहारशाळेत लपतात आणि त्यांची चकमक झडते, तेव्हा विलची अशी खेचतात की काय सांगू.

CJS = तुम जाने पहचाने लगते हो. क्या पहले कभी मर खायी है मुझसे?
ये तलवारे कौन बनता हैं?
विल = मै. और रोज ३ घंटे सीखता हूँ.
CJS = तुम्हारी उम्र तो तलवारे चलानेकी नाही, इश्क लड़ानेकी है. ओह्ह…शायद तुम्हारी कोई माशूका है जिसे तुम
तलवार चलाकर खुश करते हो. शायद तुम्हे किसी लड़की को खिश करनेका सिर्फ यही एक तरीका मालूम है…..
(एकवार आपादमस्तक न्याहाळून) कोई गडबड तो नही है ना?

कमोडोर ने पकडले असताना तर असे करारे जवाब देतात की काय सांगू!

कमोडोर norington = “बंदूक मे ना गोली है ना बारूद . एक कंपस जो बिलकुल खराब है. ( तलवार पाहून)
मुझे तो लगा था की तलवार भी लकड़ी की होगी. तुम तो समुद्री लुटेरोंका नाम बदनाम कर रहे हो jack .

CJS = बदनाम होगा तो क्या नाम न होगा? (कमोडोर ला कळायचं बंद ( हा डायलॉग अस्मादिकांनी नंतर अगणित प्रसंगी वापरला))…

आणि त्याचा तो फेव्हरीट डायलॉग -

” साहेबान , मोह्तर्मा; ये शख्स आपको हमेशा याद रहेगा जो आपके हाथ आकर निकल गया – कप्तान jack sparrow . !! “

त्याला बर्बोसाचे साथीदार पकडतात आणि विल ला आधीच बळी देण्याकरिता आणलेले असते तो तर खल्लास डायलॉग आहे .
विल त्याला एलिझाबेथ बद्दल विचारतो तेव्हा तो म्हणतो-

” वह महफूज है , और कमोडोर से शादी कर रही है जसा की उसने वादा किया था; तुमने उसके लिए अपनी जान खतरे
में डाली जैसा तुमने वादा किया था, और मै यहाँ तुम्हारे साथ आया जैसा मैंने वादा किया था . याने हम सब अपने अपने
वादे के पक्के इन्सान है – एलिज़ाबेथ को छोडके ;क्योंकि वो तो एक हसीं औरत है न!”

असे अनेक मासले देता येतील. पण कप्तान साहेबांना असे जिवंत करणारे जॉनी डेपसाहेब यांची स्तुती करावी तितकी थोडीच.
चाचे= रॉकस्टार हे समीकरण पक्के करून त्यांनी भूमिकेत असा काही प्राण ओतला की बस – ते अद्वैत झाले.

jack sparrow हे प्रकरण इतके गाजले आणि अस्मादिकांच्या मनात एक स्पेशल कोपरा पटकावून बसले. स्वतंत्रतेची
अतिशय तीव्र जाणीव घेऊन सकल करेबियन सागर भ्रमंती करणारा jack म्हणजे स्वातंत्र्याचा एक मूर्तिमंत आविष्कारच वाटतो.
अर्थात नीती-अनीती अशा अर्थ हीन वादात मला शिरायचे नही,पण माणसाची आदिम प्रवृत्ती चेतवून तिचे समर्थन करणारा jack
जबरदस्त भुरळ पडतो हे नक्की.

त्यामुळे वाटते, की खास रिचर्ड बर्टनच्या परंपरेतील पात्र आहे हे. असो. बर्टन साहेबांबद्दल परत कधीतरी.

आणि चाच्यांचे हे राष्ट्रगीत -

Posted in सिनेमा | 4 प्रतिक्रिया

अस्वस्थ योद्धा ( धनुष्य न मिळालेला)

काहीच सुचत नाहीये..जग कुठून कुठे चाललंय, कसल्या कसल्या घडामोडी होताहेत आणि मी नुसता हातावर हात ठेवून गप्प बसलोय.अरे पण मी असा आहे तरी कोण? कोणीच नाही. मला माहिती आहे की मी कोणीही नाही, पण हे मन स्वस्थ बसू देत नाही खरे. अशी ओढ लागलीये , की जिणे अशक्य करून सोडलेय. तिथे घडताहेत रोजच्या रोज रामायणे आणि महाभारते , युद्धे आणि विश्वयुद्धे आणि मी मात्र अजून घरात च बसलोय. तिथे किल्ल्यांवर किल्ले उद्ध्वस्त होताहेत, अस्त्रांवर अस्त्रे सोडली जाताहेत, आणि मी माझे गंजलेले भाले-बाण नुसतेच पाहत बसलोय. ही शस्त्रे मी परजणार तरी कधी, त्यांच्या सहाय्याने युद्ध करणार तरी कधी आणि थोडाथोडका योद्धा होणार तरी कधी? कधी? कधी?

हे काय चाललंय नेमकं? सध्या गणित विश्वात अशा काही घडामोडी घडताहेत, की स्वस्थ बसवत नाही. हैदराबादेत आता स्वयंवर होणार आहे गणिताचे- सगळे अतिरथी महारथी येतील तिथे. आणि मेडल श्री तिथे वरेल एकाला. कोण कोण येणार आहे बरे तिथे? एस आर एस वर्धन , ngo chao यांसारखे द्रोण-अर्जुन तिथे उपस्थिती लावतील. बऱ्याच अस्त्र-शस्त्रांची परीक्षा होईल तिथे. ट्या महा गणित मेळ्याला जाईन आणि संतोष पावेन, असे मांडे मनात खात असतानाच दुसरा एक बॉम्ब पडला.

अमेरिकेच्या उत्तर खंडात विनय देवळालीकर नामक संशोधकांनी P vs NP या गेली ४० वर्षे डोके खात असलेल्या समस्येचे निराकरण केले आहे अशी बातमी पसरली आणि भल्याभल्यांचे धाबे दणाणले. कोणी म्हणाले लई भारी , कोणी म्हणाले अजून वेळ आहे मत व्यक्त करायला , तर कोणी म्हणाले की ब्रह्म सत्य प्रूफ मिथ्या. आर जे लिप्टन आणि इतर प्रस्थापितांनी काही possible चुका काढल्या आहेत, बघू काय होते ते. पण सध्या तरी प्रचंड खळबळ आहे सगळीकडे. वर आणि रफ and टफ सेट आहेत च डोके खायला actuary बरोबर . वैताग……

पण पूर्ण वैताग नाही खरे तर. पाहू बे. अजून रीमान ला तरी कोणी हात नाही लावला न, मग ठीक आहे.

riemann

Posted in Uncategorized | 4 प्रतिक्रिया

संस्कृत माघ आणि मराठी फाल्गुन!

फेसबुक वर हर्शल नामक मित्राने माघ कवी यांचे काही शिशुपाल वधामधील श्लोक उद्धृत केले आहेत.

दाददो दुद्ददुद्दादी दाददो दूददीददोः ।

दुद्दादं दददे दुद्दे दादाददददोऽददः ॥

हे (म्हणे बरे का) कृष्णाचे वर्णन आहे . आणि हे

जजौजोजाजिजिज्जाजी तं ततोऽतितताततुत् ।
भाभोऽभीभाभिभूभाभू- रारारिररिरीररः ॥

हेही कुणा योद्ध्याचे वर्णन आहे .

हे वाचून मनात विचार आला, की माघ कवी जर संस्कृत मध्ये असे काव्य लिहू शकतात, तर मराठी मध्ये आपण कमीतकमी “फाल्गुन” तरी करावयास काहीच हरकत नाही.
खालील श्लोक हे तस्मात अस्मादिकांच्या शिमगेच्छुक मनाचा परिणाम आहेत.

तारा तीर तरे, रुते तरी रते, तारा तरे रात रे |
रातोरात तरातरा , तरि रती रेतीत ती रात रे |
रेती ती तरिता रुते रति तरी तीरात रातीत रे |
तारी ती तरि ती रते, रिति तरी राती रती तीत रे ||१||

मनी नाम नमी “नामी”, मान मानून मी मनी |
मौने नमुनी नामा मी, नमी नामी मुनी मनि ||2||

गाजे गा जगि जो जागा जोगी जो जोग गा जगे |
जा! जा! गा! गा! जगी गाजा, जाग गाजो जगोजगी ||३||

विशेष आभार : माघ आणि हर्शल!

Posted in कविता-बिविता | 8 प्रतिक्रिया

केरळकोकीळ आणि एक मोरोपंती चाळा

नुकतीच, कशी कोण जाणे, केरळ कोकीळ या आता विस्मृतीवश झालेल्या मासिकाची फार तीव्रतेने आठवण आली. ते मासिक वाचण्याचा मला तरी योग नाही आला, पण २० व्या शतकाच्या सुरुवातीस सर्व लेखकांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. माझ्या आठवणीप्रमाणे कोणी कृष्णाजीपंत जोशी म्हणून ते मासिक चालवीत असत. (चूकभूल देणे घेणे) त्या मासिकात विविध गोष्टी येत असत. पण खालील आर्या तेव्हा मराठी आणि इंग्लिश च्या मिश्रणामुळे खूप गाजल्या होत्या. त्यांचा एक मासला खालील प्रमाणे आहे-

मिस्टर नानाभाई. तुम्ही जो धाडीलात सर्व्हन्ट |
गुड फॉर नथिंग आहे, अदराची लागली असे वोन्ट(want ) ||

यास्तव पर्सनलीने दुसरा बहु बेस्ट man सेंड करा |
पडला मोर पे जरी, केअर त्याची मुळीच न धरा ||

ट्रेनीतुनी मेहुणीला करितो आज dispatch बॉम्बेस |
कारण तिचा म्हातारा आहे बहु ओल्ड आणि डाम्बीस |

या ओळी परवा अचानक मनी आल्या, आणि येक मोरोपंती चाळा करावा, असा विचार मनी आला. अर्थात भुजंगप्रयाताची यातायात करणे आणि शार्दूलविक्रीडीतांची आयाळ कुरतडणे जरी जमले तरी आर्या ही खास मोरोपंतांची….त्या ३० मात्रांवर मात्र मात्रा चालत नाही, आणि कदाचित चाललीच, तर मात्र त्या मात्र होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पात्रापात्रतेचा निकष लावून त्याला कात्री लावण्या आधी ही अस्मादिक-आर्यावली सादर करीत आहे.

ऐसेची देखता आला तुम्हीच अमुच्या आठवणीत |
अनुदिन मनी येतसे मजसी तुमची मज आठवण नीट |
स्तव तव आळवीन मी, विविधही रसमयी आठ वाणीत |
लोक ते सकल जगती, तुजला बहु इति आणि अथ वानीत | |

अर्थात ही अवजड आर्या नसून सुटसुटीत आर्या आहे हे सुटलेल्यांना आणि न सुटलेल्यांना सांगणे न लगे(!). यातून पाकनिष्पत्ती झाली , की पाकिस्तान उजाड होईल, हे मात्र नक्की. एकदा ते झाले, की मग स्त्रियांना आवडणारे शिकरण करता येईल.( नारी-केल-पाक) आणि मग मात्र द्राक्षरसाची मिजास (मी-जास्त) संपेल . आणि मग-

द्राक्ष लोकी क्षयो जाला | राम नारळ संगमे |
उदंड खोबरे झाले | चटणी ती करावया||
कितीही करिता डोसे | चटणी नच संपते|
सांबार-ए -इडलीसाठी | निधी तो नष्टला जरी||

असो. कदाचित माझे डोके ठिकाणावर नाहीये बहुतेक. पण कृष्णमौक्तिकाचे कप्तान म्हणतात त्याप्रमाणे ठिकाणावर आहे ते डोके कसले? आणि १९५३ साली शिवाजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे ठिकाणावर नसलेली डोकी उडविण्याचा हुकुम औरंगजेब देणार नाही याची खात्री आहे अस्मादिकांना. त्यामुळे प्रिय वाचकांनो,( त्यांचे अस्तित्व का कुणास ठाऊक , मी गृहीत धरले आहे.) आजच्या पोस्ट चा एकमेव हेतू म्हणजे मी आलो आहे..पुनरेकवार मी आपली डोकी यथासांग खाईन….हेहे…

Posted in Uncategorized | 4 प्रतिक्रिया

न गजबज न बजबज – फक्त मिरज. —

मिरज नगरपालिका

miraj

सिध्दीविनायक हॉस्पिटल

hospital

आज थोडका फ्री जाहलो, तस्मात मिरजेवर काही लिहावे ऐसा मानस. मिरज ही अस्मादिकांची आद्य कर्मभूमी. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर आणि कानडी मुलुखाच्या तोंडाशी वसलेले छोटेसे गाव. जवळपास म्हैसाळ, शेडबाळ , नरवाड, टाकळी, कळंबी इत्यादी अगणित खेडी आणि सांगली, जयसिंगपूर, कोल्हापूर इत्यादी शहरे. कृष्णा नदी जवळच तीनेक मैलांवर अर्जुनवाडला. मस्त हवा, सुपीक माती, आणि तसेच लोक. येथेच अस्मादिक पहिल्यांदा बागडले, येथील गल्ल्याबोळांतून यथेच्छ सायकली फिरविता फिरविता आणि किल्ल्याच्या भग्न खंदकात शिल्लक असलेल्या गुढगाभर गढूळ शेवाळलेल्या पाण्यात मगरी हुडकायचा फजूल प्रयत्न करता करता बालपण सरले, विद्या आणि वित्ताच्या शोधार्थ आधी कृष्णा ओलांडून “पुनक विषयात” ४ संवत्सर वास्तव्य केले , त्यानंतर महानदी ओलांडून वंगदेशी पदार्पण केले, पण या देशांतरात मिरज मात्र धृवपदी अचल होते आणि आहे.

मिरजेचा इतिहास अभिमानास्पद आहे हे नक्की. शिलाहार काळापासून कर्नाटकात जाण्याच्या मुख्य व्यापारी मार्गावरील महत्वाचे ठाणे म्हणून मिरज लोकांना माहीत होते . त्या काळात (इ स १२ व्या शतकात) मिरजेत “वीर वळंज ” नामक व्यापारी संघटना होती, ज्याचे ४००० पर्यंत सदस्य होते की जे पार तेलंगणापर्यंत व्यापार करीत असत. बहामनी आणि आदिलशाही काळात मिरजेचा भुईकोट किल्ला बांधला गेला. सतराव्या शतकातील महाराष्ट्राची जी ३ उत्तुंग शिखरे – समर्थ रामदास, तुकोबा आणि शिवाजीमहाराज यांपैकी तुकोबा सोडले तर बाकी दोघांनी येथे हजेरी लावलेली आहे समर्थशिष्या वेणाबाई या मिरजेच्या.वेणाबाई मठ मिरजेत आजही आहे. पुढे पेशवाईत मिरज पटवर्धन घराण्याकडे आले आणि या घराण्याने पेशव्यांची दक्षिणेकडील आघाडी कायम मजबूत ठेवली. प्रसिद्ध सरदार बापू गोखले हेही मिरजेचे- ज्यांनी पुण्याची इंग्रज रेसिडेन्सी उध्वस्त केली १८१८च्या खडकीच्या लढाईत. प्रसिद्ध इतिहासकार वासुदेव शास्त्री खरे हेही मिरजेचे. शारदा नाटकाचा पहिला प्रयोग हादेखील मिरजेत झाला हंसप्रभा थिएटरमध्ये.स्वातंत्र्यसैनिक पुंडलीकजी कातगडे हेही मिरजेचेच. पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांनी गांधर्व महाविद्यालय मिरजेतच सुरु केले. मिरजेचे संस्थानिक पटवर्धन संगीतप्रेमी असल्याने येथील संगीताला बहर आला. अब्दुल करीम खान हेही मिरजेचे- आणि (अस्मादिक स्वत:ला बहुत बहुत धन्य समजतात, कारण त्यांच्या घरापासोन ते जवळ राहतात ) असो.आणि बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, विनायकराव पटवर्धन हे दिग्गज देखील मिरजेचेच. संगीतातील या महान तार्यांची प्रभावळ मिरजेतच वाढली.( इतका मोठा काल आणि इतके लोक एका परिच्छेदात कोम्बण्याचे एकमेव कारण म्हणजे पुढील अजून १ लेख यावरच असेल.)

मिरजेत काय आहे? बेष्ट हवा, मोकळी जागा, पहावे तिथे अनेक बेष्ट तंतुवाद्ये, असंख्य दवाखाने आणि….आणि द्विपाद, सोबत चतुष्पाद(गाई, गर्दभ हे मेजोरीटी) मिरजकर त्यांना विचारले की म्हणतात- डॉक्टर,धूळ आणि गाढवे( मी नाही हो त्यातला!) आणि पुण्यामुंबईकडचे आंग्ल पेपरवाले देखील चुकून कधी मिरजेवर मेहेरनजर झालीच, तर चक्क गाढवांची बातमी देतात! (अर्थात हे मी प्री-दंगल बोलतोय हे ध्यानी असू द्यावे.) डॉक्टर तर असंख्य आहेत- त्याबाबतीत काहीसा वाराणसीप्रमाणे प्रकार आहे खरा- रुग्णांपेक्षा डॉक्टरच जास्त! आणि तेदेखील अगदी “सब ट्रीटमेंट १० रुपये” पासून स्पेशालीस्ट, सुपर-स्पेशालीस्ट आणि सुपर-डुपर स्पेशालीस्ट. दक्षिणेकडील तसेच कोकणातील लोक त्यांना आपापल्या गावी करमेनासे झाले, की मिरजेला हजेरी लावून जातात. धूळ तर पाचवीलाच पुजली आहे- पण चार्ल्स नेपियरने म्हटल्याप्रमाणे “आम्ही धुळीत राहतो , धूळ खातो”, त्यामुळे धुळीस देखील धुळीस मिळविण्याचा महान पराक्रम केलेले हे मिरजकर! बाकी तिसर्याबद्दल बोलावे तर यांची पैदास जगात सगळीकडे आणि प्रमाणाबाहेर आहे. त्यामुळे मिरजेने तरी कुणाचे गाढव मारलेले नाही या बाबतीत.

बाकी मिरजकरांची भाषा हा खास संशोधनाचा विषय आहे. इथली मराठी ही कन्नडचा एक खास लहेजा घेऊन आलेली आहे. त्यामुळे अस्सल मिरजकर मराठी माणसाची मातृभाषा ही काहीशी कन्नडमोळी मराठी आहे. ह्या अद्वितीय भाषेतील काही खास शब्दप्रयोग अगदी वेचीव नग आहेत, जसे की “मारणे”. या शब्दाचा अर्थ मारणे, मारामारी करणे असा आहे हे चांद्यापासून बांद्यापर्यंत अख्खा मराठी माणूस मान्य करतो. पण मिरजेत मात्र तसे नाही. इथे “मारणे” हा शब्द “करणे” या अर्थी वापरला जातो. खास मिरजकरी मराठीचा नमुना म्हणून खालील उतारा पाहण्यासारखा आहे:

अ: कुठं चाललायस एकटाच सायकल मारत ?
ब : अरे गेल्तो हवा मारायला .
अ : परवा त्या हिला कोण प्रपोज मारला म्हणे?
ब : काय की माहित नाही . पण क तिला कायम कट मारायचा .
अ : क कायम ऐंशिने गाडी मारतो नुसता गावभर फिरत असतो. थांबताना ब्रेक पण असा कचकन मारतो.
ब : कॉलेज तर कायमचेच बंक मारतो.
अ : सोड रे , त्याला जाऊदे कृपामयीत. आपण एक चहा मारू चल .

या संभाषणात एका “मारणे” या शब्दाचे इतके पैलू आहेत, पण हे तर हिमनगाचे टोक आहे फक्त. विविधतेतून एकते ऐवजी “एकोऽहं बहु:स्यां” हे इथले सूत्र आहे . आणि “कृपामयीत जाणे” हादेखील तसाच एक वाक्प्रचार. खड्ड्यात जाणे, तेल-तूप लावत जाणे इत्यादी सर्व तत्सम आणि तद्भव शब्दांचे प्रतिनिधित्व करणारा हा वाक्प्रचार.

ही झाली मराठी. पण हिंदीची चिंधी फाडण्यात देखील मिरजकर अजिबात कमी नाहीत. औरंगजेबाच्या मृत्यूत मिरजेच्या हिंदीचा सिंहाचा नसला तरी वैतागाचा वाटा नक्कीच असावा, असे खुद्द पु ल त्यांच्या गाळीव इतिहासात एके ठिकाणी म्हणतात. खासा औरंगजेब मिरजेत १७००(किंवा १७०१) साली आला, जानेवारी ते फेब्रुवारी २ महिने राहिला, त्या अवधीत त्याला ह्या हिंदीचा संसर्ग झाला असावा, असे म्हणण्यास बरीच जागा आहे. पण ही हिंदी ही मराठी + कन्नड उद्भव आहे . ती सुरु होते ती मराठीपासून आणि संपते तीदेखील मराठीच्याच कुशीत.

अ: अरे वो तेरी फुवा का बेटा कामा नई करता, खाली बोलता “मै आता जाको, तुम लोगा काम करो बोलके.
अ; “ऐसा असतंय व्हय?”
ब : वहीच मै बोल्या उसकू, कबसे करतंय, ऐसे कामा करते तो लोगा आते नई.
अ: अम्मीको बोलतू मै तो बोलता ऐसिच तेरी दोस्ती, निस्ता बसतंय.
ब: बडी फज्जरसे देख्या उसे, सब मापा, टेपा, पायपा वहीच पड्या था.
अ: आज तो अब्बाको बोलता मै, ये आदमी कामा नई करता, अपनेको नई परवडेगा,
नया आदमी होना अपनको.

हाडाचा मिरजकर हा मिरजेचा जाज्वल्य अभिमान घेऊन असतो. कोणी सांगलीशी तुलना केली, की लगेच शेरीनाला, गव्हर्नमेंट कॉलनीमधील दरवडे , असे विषय काढावेत, म्हणजे सांगलीकर बिचारा गप्प होतो. आणि मिरजेतल्या मिरजेत तरी प्रकरण धड आहे का? “गावात” उर्फ ब्राह्मणपुरी भागातील लोकांनी मिरजेचा मक्ता घ्यायचा की मेडिकल कॉलेज आणि रेल्वे स्टेशन जवळच्या लब्धप्रतिष्ठितांनी? यावरही छुपे अभिमान बाळगले जातात. पण अशी भांड्याला भांडी लागली म्हणून काही मिरासाहेबाच्या उर्सातील गम्मत कमी होत नाही आणि बसाप्पाच्या पेढ्याची चव कमी होत नाही, उलट अधिक वाढते. खरे महत्वाचे मतभेद म्हणजे भेळीत भेळ ही गाडगीळ बाईची की परसरामची? आणि राहण्यासाठी बेष्ट एरिया कोणता? हे आहेत. लाखभर वस्ती असलेल्या या चिमुकल्या गावात देवळे, मशिदी, चर्चेस आणि जैन बस्ती या सर्वांनी हजेरी लावली आहे, तीसुद्धा खूप आधीपासून. एक प्रकारे भारताचे प्रतिबिंबच असलेले हे माझे छोटेसे गाव मिरज – त्याच्या इतिहासाचा थोडासा मागोवा मी इतिहासाच्या भाष्यकारांना वाट पुसत घेणार आहे. आपण सर्वांना त्याची माहिती असावी, म्हणून हा लेखनप्रपंच.

क्रमश:

Posted in इतिहास-भारत | 38 प्रतिक्रिया

जपानी इतिहासाचा मागोवा – भाग २

hideyoshi

numbunaga

जपानी इतिहासाचा मागोवा – भाग २
(पूर्वसूत्र: जपानी इतिहासातील Heian कालखंड ( इ.स. 794 – 1185 ) च्या अखेरीस जपान मध्ये एका लढवय्या वर्गाचा उदय झाला. यांत तीन गट होते. तेच सामुराई या संस्थेचे आजेपणजे होत. हळूहळू या कालखंडात सामुराईन्चा उदय झाला, सोबत सामंतशाहीची बीजे काही प्रमाणात रुजवली गेली. इ.स.१३३३ सालच्या लढाईत ज्या Ashikaga clan ने सम्राटाला मदत केली होती, त्याच clan चा प्रमुख Takauji ने सम्राटाच्या सैन्याला हरवले आणि स्वतःला १३३८ साली shogun म्हणून घोषित केले. त्याने सध्याच्या Kyoto शहराजवळील मुरोमाची नावाच्या ठिकाणी तळ ठोकला आणि त्यावरूनच या कालखंडाचे नाव पडले मुरोमाची कालखंड . १४६७ साली जपान मध्ये यादवी युद्ध सुरु झाले. Shogun पदी असलेल्या Ashikaga clan च्या शेवटच्या shogun ने १५७३ साली shogun पद सोडले आणि मुरोमाची कालखंड संपला. )

Muromachi कालखंडाचाच एक भाग म्हणजे Sengoku कालखंड ( इ स. १४६७ – १५६८, period of warring states ). ११८५ साली ( Kamakura कालखंड ) शोगुन होण्याआधी Minamoto no Yoritomo याने सामंतशाहीची बीजे रुजवायला सुरुवात केली होती. त्याने प्रत्येक province साठी ‘shugo’ म्हणजेच रक्षक किंवा ‘लष्करी प्रशासक ‘ नेमले होते. पुढे चालून Sengoku कालखंडात या ‘shugo’ च्या अधिपत्याखाली असणार्या गटांमध्ये आणखीन लहान गट तयार झाले. या गटांचे नेते म्हणजे ‘daimyo’ किंवा ‘सामंत ‘. सामुराई हे या कुठल्या ना कुठल्या ‘daimyo’ शी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यायचे.या बदल्यात त्यांना काही जमीन आणि तिथे राहणारे लोक या दोन्हीवर ताबा मिळायचा. कट्टर शत्रू असणार्या ‘daimyo’ मध्ये जोरदार लढाया व्हायच्या. बौद्ध मठांचे रक्षण काही लढाऊ भिक्षु करायचे. या सामंतांचे सत्ता काबीज करण्यातील एकूण यशापयश हे सैनिकी ताकदीवर अवलंबून असे.

अशा या धामधुमीच्या काळात जपानची आर्थिक भरभराट झाली. शेतीतंत्राज्ञानातील प्रगती, भाताच्या नवीन प्रजाती या मुळे शेतीचे उत्पादन वाढले. अंतर्गत व्यापाराबरोबरच चीन आणि कोरिया या देशांबरोबरच्या व्यापारालाही वेग आला. या काळी जपानमधून तलवारी, तांबे , आणि गंधक यांची निर्यात होत असे. बरीच नवी बंदरे देखील त्या काळात विकसित झाली. त्या काळचे Sakai , म्हणजेच सध्याचे प्रसिद्ध Osaka शहर हे ‘daimyo’च्या ताब्यात नसून इथले प्रशासन व्यापार्यांच्या हातात होते . अशा प्रकारे Muromachi कालखंडात पहिल्यांदा जपान मध्ये सामंतशाहीचा उदय होताना दिसतो.

Sengoku कालखंडातल्या सततच्या लढायांमुळे जीवित आणि वित्तहानी खूपच झाली. जपानचे अनेक लहान तुकडे पडले. पण त्यानंतर ३ अतिशय महान नेत्यांच्या कारकिर्दीची सुरुवात Momoyama कालखंडात ( १५७३ – १६०३ ) झाली. यापैकी पहिला होता Oda Nobunaga. हा मध्य जपान मधला daimyo खूपच महत्वाकांक्षी आणि अतिशय क्रूर होता. युद्धात पाडाव झालेले शत्रू आणि त्यांचे कुटुंबीय यांना तो जिवंत जाळायचा. त्याचा विरोधात जाणार्या बौद्ध भिक्षूंची कत्तल करायचा आणि हे कमी होते की काय म्हणून स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना देखील तो ठार मारायचा. हा क्रूरतेच्या बाबतीत मध्य आशियातील तैमुरादी लोकांचा जपानी अवतारच म्हणावा लागेल.

या काळात पहिल्यांदाच युरोपियनांचे पाऊल जपानी भूमीवर पडले. त्यांनी येताना २ अशा गोष्टी आणल्या ज्यांचा पुढील काळात जपान वर निर्णायक प्रभाव पडला. एक म्हणजे क्रिश्चन धर्म आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधुनिक शस्त्रसामग्री. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी जवळचा संबंध होता. कारण काही सामंत फक्त व्यापार वाढावा म्हणून क्रिश्चन धर्माला जवळ करायचे.

तेव्हा शेकडो लहानसहान तुकडे झालेल्या जपानला एकत्र आणण्याचा पहिला प्रयत्न Nobunaga ने केला. त्याने अनेक रस्ते बांधले. जपानच्या अंतर्गत व्यापारावरील जकात त्याने रद्द केली . बौद्ध भिक्षूंची ताकद प्रमाणाबाहेर वाढू नये म्हणून त्यांच्या पायात क्रिश्चन धर्माचा पायगोवा ठेवला.

१५८२ साली वयाच्या ४९व्या वर्षी त्याच्याच एका अधिकार्याने त्याचा खून केला. यानंतर Nobunaga चे पुत्र आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या लढाईत Toyotomi Hideyoshi हा विजयी ठरला आणि सत्तेवर आला. Hideyoshi लहान चणीचा आणि कुरूप होता असे म्हणतात. इथवर की Nobunaga त्याला ‘माकड’ म्हणायचा, अशी वदंता आहे . पण एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून देखील तो स्वकर्तृत्वावर Nobunaga च्या सगळ्यात उत्तम सेनापातींपैकी एक झाला. Hideyoshi हा युद्धात निर्घृणपणे संहार करायचा पण वेळप्रसंगी मित्रत्वाचा हात पुढे करून, शत्रूचे मान जिंकून अनावश्यक युद्ध टाळायचा. हरलेल्या शत्रूकडून त्याचे वतन काढून घ्यायचे आणि ते आपल्या भरवशाच्या माणसांना द्यायचे, ही पूर्वापार चालत आलेली पद्धत त्यानेही चालू ठेवली. यामुळे , स्थानिक सामन्तांवर त्याचा अंकुश राहायचा आणि Hideyoshi चे निकटवर्तीय सामंत ही खुश व्हायचे. काही सामंत नाकापेक्षा जड होऊ पाहतायत , असे दिसून आल्यावर त्यांना तो कुठल्यातरी दूरच्या भागात पाठवून द्यायचा.

सामुराई शिवाय इतर कोणीही तलवार बाळगू नये असा फतवा Hideyoshi ने काढला. यामुळे समाजातील इतर वर्गांना सामुराई विरुद्ध बंड करणेही अवघड झाले. परिस्थिती इथवर आली होती, की स्थानिक सामंतांना स्वतःचे कुटुंब हे Hideyoshi च्या निगराणीखाली ठेवून आपल्या वतनाची व्यवस्था पाहायला जावे लागत असे . समाजव्यवस्था अतिशय साचेबंद झाली होती.

१५९१ साल येईपर्यंत Hideyoshi ने जवळजवळ अख्खे जपान काबीज केले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्याने कधीच स्वतःला shogun म्हणवून घेतले नाही. सैन्यासाठी लागणारी आर्थिक व्यवस्था व्हावी म्हणून त्याने Osaka आणि Nagasaki सारखी व्यापारी दृष्टीने महत्वाची असलेली गावे आणि सोन्या-चांदीच्या खाणी ताब्यात घेतल्या. यातून मिळालेले धन त्याने १५९०च्या सुमारास चीन आणि कोरियावर हल्ला करण्यासाठी वापरले. त्याच्या हल्ल्यामुळे चीनचे सरकार कमकुवत झाले,कोरियाचीही भरपूर हानी झाली. पण Hideyoshi ला स्वतःचे साम्राज्य काही वाढवता करता आले नाही. झाले एवढेच की तात्कालिक हल्ल्यांमुळे जपान आणि कोरियाचे आंतरराष्ट्रीय संबंध कायमचे बिघडले.

या काळात क्रिश्चन धर्म मात्र चांगलाच फोफावत होता आणि हेच Hideyoshi च्या चिंतेचे कारण होते. सुरुवातीला त्यानेही Nobunaga प्रमाणे क्रिश्चन धर्माला प्रोत्साहन दिले, पण मनातून त्याचा क्रिश्चन लोकांवर फारसा विश्वास नव्हता. त्याला सतत वसाहतीकरणाची भीती वाटायची. पण याच जपानमध्ये क्रिश्चन लोकांनी पहिल्यांदा आधुनिक शस्त्रसामग्री आणली होती आणि आता युद्धात त्याचा वापर वाढला होता. त्यामुळे त्याला उघडपणे क्रिश्चन धर्माला फारसा विरोध करता येईना. युरोपियन्स पैकी जपानमध्ये सर्वात पहिल्यांदा आले ते पोर्तुगीज. त्यांच्याबरोबर त्यांची बटाटा, मका यासारखी पिकेही आली.

Hideyoshi ला उतारवयात एक मुलगा झाला – Hideyori. पण Hideyori वयात येईपर्यंत आपण जिवंत असू की नाही अशी त्याला शंका होती. यासाठी त्याने ५ जणांचे एक मंडळ तयार केले आणि Hideyori मोठा होईपर्यंत मंडळाने राज्य करावे असे ठरले. १५९८ साली Hideyoshi मरण पावला. १६०० साली मंडळातील एक – Tokugawa Ieyasu याने मंडळातील इतर सभासदांविरुद्ध युद्ध पुकारले. Sekigahara येथे झालेल्या युद्धात त्याने Ishida Mitsunari च्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या इतर सभासदांना हरवले. अखेर १६०३ साली Tokugawa shogun झाला. १६१५ साली Hideyori आणि Hideyoshi च्या कुटुंबातले इतर सदस्यही मरण पावले आणि Edo म्हणजेच सध्याचे Tokyo येथे Tokugawa Shogunate ची स्थापना झाली.

क्रमशः

– केतकी ढेरे

Posted in इतिहास-इतर जग, केतकी ढेरे, मित्र लेखकू | 9 प्रतिक्रिया